॥ समर्थ रामदासांचा दासबोध दशक ६ ॥ षष्ठ दशक ॥ श्रीराम ॥ समास पहिला : देवशोधन चित्त सुचित करावें। बोलिलें तें जीवीं धरावें । सावध होऊन बैसावें। निमिष एक ॥ १॥ कोणी एके ग्रामीं अथवा देशीं। राहणें आहे आपणासी । न भेटतां तेथिल्या प्रभूसी। सौख्य कैंचें ॥ २॥ म्हणौनि ज्यास जेथें राहणें। तेणें त्या प्रभूची भेटी घेणें । म्हणिजे होय श्लाघ्यवाणें। सर्व कांहीं ॥ ३॥ प्रभूची भेटी न घेतां। तेथें कैंची मान्यता । आपुलें महत्व जातां। वेळ नाहीं ॥ ४॥ म्हणौनि रायापासूनि रंक। कोणी एक तरी नायक । त्यास भेटणें हा विवेक। विवेकी जाणती ॥ ५॥ त्यास न भेटतां त्याचे नगरीं। राहतां धरितील बेगारी । तेथें न करितां चोरी। अंगीं लागे ॥ ६॥ याकारणें जो शहाणा। तेणें प्रभूसी भेटावें जाणा । ऐसें न करितां दैन्यवाणा। संसार त्याचा ॥ ७॥ ग्रामीं थोर ग्रामाधिपती। त्याहूनि थोर देशाधिपती । देशाधिपतीहूनि नृपती। थोर जाणावा ॥ ८॥ राष्ट्राचा प्रभु तो राजा। बहुराष्ट्र तो महाराजा । महाराजांचाही राजा। तो चक्रवर्ती ॥ ९॥ एक नरपती एक गजपती। एक हयपती एक भूपती । सकळांमध्ये चक्रवर्ती। थोर राजा ॥ १०॥ असो ऐशिया समस्तां। एक ब्रह्मा निर्माणकर्ता । त्या ब्रह्म्यासही निर्मिता। कोण आहे ॥ ११॥ ब्रह्मा विष्णु आणि हर। त्यांसी निर्मिता तोचि थोर । तो ओळखावा परमेश्वर। नाना यत्नें ॥ १२॥ तो देव ठायीं पडेना। तरी यमयातना चुकेना । ब्रह्माण्डनायका चोजवेना। हें बरें नव्हे ॥ १३॥ जेणें संसारीं घातलें। अवघें ब्रह्माण्ड निर्माण केलें । त्यासी नाहीं ओळखिलें। तोचि पतित ॥ १४॥ म्हणोनि देव ओळखावा। जन्म सार्थकचि करावा । न कळे तरी सत्संग धरावा। म्हणजे कळे ॥ १५॥ जो जाणेल भगवंत। तया नांव बोलिजे संत । जो शाश्वत आणि अशाश्वत। निवाडा करी ॥ १६॥ चळेना ढळेना देव। ऐसा ज्याचा अंतर्भाव । तोचि जाणिजे महानुभाव। तोचि साधू ॥ १७॥ जो जनांमध्ये वागे। परी जनांवेगळी गोष्टी सांगे । ज्याचे अंतरीं ज्ञान जागे। तोचि साधू ॥ १८॥ जाणिजे परमात्मा निर्गुण। त्यासींच म्हणावें ज्ञान । त्यावेगळें तें अज्ञान। सर्व कांहीं ॥ १९॥ पोट भरावयाकारणें। नाना विद्या अभ्यास करणें । त्यास ज्ञान म्हणती परी तेणें। सार्थक नव्हे ॥ २०॥ देव ओळखावा एक। तेंचि ज्ञान तें सार्थक । येर अवघेंचि निरर्थक। पोटविद्या ॥ २१॥ जन्मवरी पोट भरिलें। देहाचें संरक्षण केलें । पुढें अवघेंचि व्यर्थ गेलें। अंतकाळीं ॥ २२॥ एवं पोट भरावयाची विद्या। तियेसी म्हणों नये सद्विद्या । सर्वव्यापक वस्तु सद्या। पाविजे तें ज्ञान ॥ २३॥ ऐसें जयापाशीं ज्ञान। तोचि जाणावा सज्जन । तयापासीं समाधान। पुशिलें पाहिजे ॥ २४॥ अज्ञानास भेटतां अज्ञान। तेथें कैंचें सांपडेल ज्ञान । करंट्यास करंट्याचें दर्शन। होतां भाग्य कैंचें ॥ २५॥ रोग्यापाशीं रोगी गेला। तेथें कैंचें आरोग्य त्याला । निर्बळापाशीं निर्बळाला। पाठी कैंची ॥ २६॥ पिशाच्यापाशीं पिशाच गेलें। तेथें कोण सार्थक झालें । उन्मत्तास उन्मत्त भेटलें। त्यास उमजवी कवणू ॥ २७॥ भिकाऱ्यापाशीं मागतां भिक्षा। दीक्षाहीनापाशीं मागतां दीक्षा । उजेड पाहतां कृष्णपक्षा। पाविजे कैंचा ॥ २८॥ अबद्धापाशीं गेला अबद्ध। तो कैसेनि होईल सुबद्ध । बद्धास भेटतां बद्ध। सिद्ध नव्हे ॥ २९॥ देह्यापाशीं गेला देही। तो कैसेनि होईल विदेही । म्हणोनि ज्ञात्यावांचूनि नाहीं। ज्ञानमार्ग ॥ ३०॥ याकारणें ज्ञाता पहावा। त्याचा अनुग्रह घ्यावा । सारासारविचारें जीवा। मोक्ष प्राप्त ॥ ३१॥ हरि ॐ तत्सत्। इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके देवशोधननिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
समास दुसरा : ब्रह्मपावननिरूपण ॥श्रीराम ॥ ऐका उपदेशाचीं लक्षणें। सायुज्यप्राप्ति होय जेणें । नाना मतांचें पेखणें। कामा नये सर्वथा ॥ १॥ ब्रह्मज्ञानावीण उपदेश। तो म्हणों नये विशेष । धान्येविण जैसें भूस। खातां नये ॥ २॥ नाना काबाड बडविलें। नातरी तक्रचि घुसळिलें । अथवा धुवणचि सेविलें। सावकाश ॥ ३॥ नाना साली भक्षिल्या। अथवा चोइट्या चोखिल्या । खोबरें सांडून खादल्या। नरोट्या जैशा ॥ ४॥ तैसें ब्रह्मज्ञानाविण। नाना उपदेशांचा शीण । सार सांडून असार कोण। शहाणा सेवी ॥ ५॥ आतां ब्रह्म जें कां निर्गुण। तेंचि केलें निरूपण । सुचित करावें अंतःकरण। श्रोतेजनीं ॥ ६॥ सकळ सृष्टीची रचना। तें हें पंचभौतिक जाणा । परंतु हें तगेना। सर्वकाळ ॥ ७॥ आदि अंतीं ब्रह्म निर्गुण। तेचि शाश्वताची खूण । येर पंचभौतिक सगुण। नाशवंत ॥ ८॥ येरवीं हीं पाहतां भूतें। देव कैसें म्हणावें त्यांतें । भूत म्हणतां मनुष्यांतें। विषाद वाटे ॥ ९॥ मा तो जगन्नाथ परमात्मा। त्यासि आणि भूतउपमा । ज्याचा कळेना महिमा। ब्रह्मादिकांसी ॥ १०॥ भूतां ऐसा जगदीश। म्हणतां उत्पन्न होतो दोष । याकारणें महापुरुष। सर्व जाणती ॥ ११॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश। यां सबाह्य जगदीश । पंचभूतांस आहे नाश। आत्मा अविनाशरूपी ॥ १२॥ जें जें रूप आणि नाम। तो तो अवघाच भ्रम । नामरूपातीत वर्म। अनुभवें जाणावें ॥ १३॥ पंचभूतें आणि त्रिगुण। ऐशी अष्टधा प्रकृति जाण । अष्टधा प्रकृतीस नामाभिधान। दृश्य ऐसें ॥ १४॥ तें हें दृश्य नाशिवंत। ऐसें वेद श्रुति बोलत । निर्गुण ब्रह्म शाश्वत। जाणती ज्ञानी ॥ १५॥ जें शस्त्रें तोडितां तुटेना। जें पावकें जाळितां जळेना । जें कालवितां कालवेना। आपेंकरूनी ॥ १६॥ जें वायूचेनि उडेना। जें पडेना ना झडेना । जें घडेना ना दडेना। परब्रह्म तें ॥ १७॥ ज्यासि वर्णचि नसे। जें सर्वांहूनि अनारिसें । परंतु असतचि असे। सर्वकाळ ॥ १८॥ दिसेना तरी काय झालें। परंतु सर्वत्र संचलें । सूक्ष्मचि कोंदाटलें। जेथें तेथें ॥ १९॥ दृष्टीस लागली सवे। जें दिसेल तेंचि पहावें । परंतु गुज तें जाणावें। गौप्य आहे ॥ २०॥ प्रगट तें जाणावें असार। आणि गुप्त तें जाणावें सार । सद्गुरुमुखें हा विचार। उमजों लागे ॥ २१॥ उमजेना तें उमजावें। दिसेना तें पहावें । जें कळेना तें जाणावें। विवेकबळें ॥ २२॥ गुप्त तेंचि प्रगटवावें। असाध्य तेंचि साधावें । कानडेंचि अभ्यासावें। सावकाश ॥ २३॥ वेद विरंचि आणि शेष। जेथें शिणले निःशेष । तेंचि साधावें विशेष। परब्रह्म तें ॥ २४॥ तरी तें कवणें परी साधावें। तेंचि बोलिलें स्वभावें । अध्यात्मश्रवणें पावावें। परब्रह्म तें ॥ २५॥ पृथ्वी नव्हे आप नव्हे। तेज नव्हे वायु नव्हे । वर्णव्यक्ति ऐसें नव्हे। अव्यक्त तें ॥ २६॥ तयास म्हणावें देव। वरकड लोकांचा स्वभाव । जितुके गांव तितुके देव। जनांकारणें ॥ २७॥ ऐसा देवाचा निश्चयो झाला। देव निर्गुण प्रत्यया आला । आतां आपणचि आपला। शोध घ्यावा ॥ २८॥ माझें शरीर ऐसें म्हणतो। तरी तो जाण देहावेगळाचि तो । मन माझें ऐसें जाणतो। तरी तो मनही नव्हे ॥ २९॥ पाहतां देहाचा विचार। अवघा तत्त्वांचा विस्तार । तत्त्वें तत्त्व झाडितां सार। आत्माचि उरे ॥ ३०॥ आपणासि ठावचि नाहीं। तेथें पाहणें नलगे कांहीं । तत्त्वें ठायींच्या ठायीं। विभागूनि गेलीं ॥ ३१॥ बांधली आहे तों गांठोडी। जो कोणी विचारें सोडी । विचार पाहतां गांठोडी। आढळेना ॥ ३२॥ तत्त्वांचें गांठोडें शरीर। याचा पाहतां विचार । एक आत्मा निरंतर। आपण नाहीं ॥ ३३॥ आपणासि ठावचि नाहीं। जन्म मृत्यु कैंचे काई । पाहतां वस्तूच्या ठायीं। पाप पुण्य नसे ॥ ३४॥ पाप पुण्य यमयातना। हें निर्गुणीं तों असेना । आपण तोचि तरी जन्ममरणा। ठावो कैंचा ॥ ३५॥ देहबुद्धीनें बांधला। तो विवेकें मोकळा केला । देहातीत होतां पावला। मोक्षपद ॥ ३६॥ झालें जन्माचें सार्थक। निर्गुण आत्मा आपण एक । परंतु हा विवेक। पाहिलाचि पहावा ॥ ३७॥ जागें होतां स्वप्न सरे। विवेक पाहतां दृश्य ओसरे । स्वरूपानुसंधानें तरे। प्राणिमात्र ॥ ३८॥ आपणास निवेदावें। आपण विवेकें नुरावें । आत्मनिवेदन जाणावें। याचें नांव ॥ ३९॥ आधीं अध्यात्मश्रवण। मग सद्गुरुपादसेवन । पुढें आत्मनिवेदन। सद्गुरुप्रसादें ॥ ४०॥ आत्मनिवेदनाउपरी। निखळ वस्तु निरंतरी । आपण आत्मा हा अंतरीं। बोध जाहला ॥ ४१॥ त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि झाला। संसारखेद तो उडाला । देह प्रारब्धीं टाकिला। सावकाश ॥ ४२॥ यासि म्हणिजे आत्मज्ञान। येणें पाविजे समाधान । परब्रह्मीं अभिन्न। भक्तचि जाहला ॥ ४३॥ आतां होणार तें होईना कां। आणि जाणार तें जाईना कां । तुटली मनांतील आशंका। जन्ममृत्यूची ॥ ४४॥ संसारीं पुंडावें चुकलें। देवां भक्तां ऐक्य झालें । मुख्य देवासि ओळखिलें। सत्संगेंकरूनी ॥ ४५॥ हरिः ॐ तत्सत इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके ब्रह्मप्रतिपादननिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २॥
समास तीसरा : मायोद्भवनिरूपण ॥श्रीराम ॥ निर्गुण आत्मा तो निश्चळ। जैसें आकाश अंतराळ । घन दाट निर्मळ निश्चळ। सदोदित ॥ १॥ जें खंडलेंचि नाहीं अखंड। जें उदंडाहूनि उदंड । जें गगनाहूनि वाड। अति सूक्ष्म ॥ २॥ जें दिसेना ना भासेना। जें उपजेना ना नासेना । जें येईना ना जाईना। परब्रह्म तें ॥ ३॥ जें चळेना ना ढळेना। जें तुटेना ना फुटेना । जें रचेना ना खचेना। परब्रह्म तें ॥ ४॥ जें सन्मुखचि सर्वकाळ। जें निष्कलंक आणि निखळ । सर्वांतर आकाश पाताळ। व्यापूनि असे ॥ ५॥ अविनाश तें ब्रह्म निर्गुण। नासे तें माया सगुण । सगुण आणि निर्गुण। कालवलें ॥ ६॥ या कर्दमाचा विचार। करूं जाणती योगीश्वर । जैसें क्षीर आणि नीर। राजहंस निवडिती ॥ ७॥ जड सकळ पंचभौतिक। त्यामध्यें आत्मा व्यापक । तो नित्यानित्यविवेक। पाहतां कळे ॥ ८॥ उंसामधील घेईजे रस। येर तें सांडिजे बाकस । तैसा जगामध्यें जगदीश। विवेकें ओळखावा ॥ ९॥ रस नाशवंत पातळ। आत्मा शाश्वत निश्चळ । रस अपूर्ण आत्मा केवळ। परिपूर्ण जाणावा ॥ १०॥ आत्म्यासारिखें एक असावें। मग तें दृष्टांतासि द्यावें । दृष्टांतमिसे समजावें। कैसें तरी ॥ ११॥ ऐशी आत्मस्थिति संचली। तेथें माया कैशी झाली । जैशी आकाशीं वाहिली। झुळूक वायूची ॥ १२॥ वायूपासून तेज झालें। तेजापासून आप निपजलें । आपापासून आकारलें। भूमंडळ ॥ १३॥ भूमंडळापासून उत्पत्ती। जीव नेणों झाले किती । परंतु ब्रह्म आदि अंतीं। व्यापून आहे ॥ १४॥ जें जें कांहीं निर्माण झालें। तें तें अवघेंचि नासलें । परी मुळीं ब्रह्म तें संचलें। जैसें तैसें ॥ १५॥ घटापूर्वीं आकाश असे। घटामध्येंही आकाश भासे । घट फुटतां न नासे। आकाश जैसें ॥ १६॥ तैसें परब्रह्म केवळ। अचळ आणि अढळ । मध्यें होत जात सकळ। सचराचर ॥ १७॥ जें जें कांहीं निर्माण झालें। तें तें आधीं ब्रह्में व्यापिलें । सर्व नासतां उरलें। अविनाश ब्रह्म ॥ १८॥ ऐसें ब्रह्म अविनाश। तें सेविती ज्ञाते पुरुष । तत्त्वनिरसनें आपणास। आपण लाभे ॥ १९॥ तत्त्वें तत्त्व मेळविलें। त्यासि देह ऐसें नाम ठेविलें । तें जाणते पुरुषीं शोधिलें। तत्त्वें तत्त्व ॥ २०॥ तत्त्वझाडा निःशेष होतां। तेथें निमाली देहअहंता । निर्गुण ब्रह्मीं ऐक्यता। विवेकें जाहली ॥ २१॥ विवेकें देहाकडे पाहिलें। तों तत्त्वें तत्त्व ओसरलें । आपण कांहीं नाहीं आलें। प्रत्ययासी ॥ २२॥ आपला आपण शोध घेतां। आपुली तों मायिक वार्ता । तत्त्वांतीं उरलें तत्त्वता। निर्गुण ब्रह्म ॥ २३॥ आपणाविण निर्गुण ब्रह्म। हेंचि निवेदनाचें वर्म । तत्त्वासरिसा गेला भ्रम। मीतूंपणाचा ॥ २४॥ मीपण पाहतां आढळेना। निर्गुण ब्रह्म तें चळेना । आपण तेंचि परी कळेना। सद्गुरूविण ॥ २५॥ सारासार अवघें शोधिलें। तों असार तें निघून गेलें । पुढें सार तें उरलें। निर्गुण ब्रह्म ॥ २६॥ आधीं ब्रह्म निरूपिलें। तेंचि सकळामध्यें व्यापिलें । सकळ अवघेंचि नासलें। उरलें तें केवळ ब्रह्म ॥ २७॥ होतां विवेकें संहार। तेथें निवडे सारासार । आपला आपणासि विचार। ठायीं पडे ॥ २८॥ आपण कल्पिलें मीपण। मीपण शोधितां नुरे जाण । मीपण गेलिया निर्गुण। आत्माचि स्वयें ॥ २९॥ झालिया तत्त्वांचें निरसन। निर्गुण आत्माचि आपण । कां दाखवावें मीपण। तत्त्वनिरसनाउपरी ॥ ३०॥ तत्त्वांमध्यें मीपण गेलें। तरी निर्गुण सहजचि उरलें । सोहंभावें प्रत्यया आलें। आत्मनिवेदन ॥ ३१॥ आत्मनिवेदन होतां। देवभक्तांस ऐक्यता । साचार भक्त विभक्तता। सांडूनि जाहला ॥ ३२॥ निर्गुणासि नाहीं जन्ममरण। निर्गुणासि नाहीं पाप पुण्य । निर्गुणीं अनन्य होतां आपण। मुक्त जाहला ॥ ३३॥ तत्त्वीं वेंटाळूनि घेतला। प्राणी संशयें गुंडाळला । आपणास आपण भुलला। कोहं म्हणे ॥ ३४॥ तत्त्वीं गुंतला म्हणे कोहं। विवेकें पाहतां म्हणे सोहं । अनन्य होतां अहं सोहं। मावळलीं ॥ ३५॥ याउपरि उर्वरित। तेंचि स्वरूप संत । देहीं असोनि देहातीत। जाणिजे ऐसा ॥ ३६॥ संदेहवृत्ति ते न भंगे। म्हणोनि बोलिलेंच बोलावें लागे ॥ आम्हांसि हें घडलें प्रसंगें। श्रोतीं क्षमा केली पाहिजे ॥ ३७॥ हरिॐतत्सत इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके मायोद्भवनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३॥
जय जय रघुवीर समर्थ ॥ समास चवथा : ब्रह्मनिरूपण ॥श्रीराम ॥ कृतयुग सत्रा लक्ष अठ्ठावीस सहस्र।त्रेतायुग बारा लक्ष शाण्णव सहस्र ।द्वापरयुग आठ लक्ष चौसष्ट सहस्र।आतां कलियुग ऐका॥१॥ कलियुग चार लक्ष बत्तीस सहस्र। चतुर्युगें त्रेचाळीस लक्ष वीस सहस्र । ऐशीं चतुर्युगें सहस्र। तो ब्रह्मयाचा एक दिवस ॥ २॥ ऐसे ब्रह्मे सहस्र देखा। तेव्हां विष्णूची एक घटिका । विष्णू सहस्र होतां ऐका। पळ एक ईश्वराचें ॥ ३॥ ईश्वर जाय सहस्र वेळ। तैं शक्तीचें अर्ध पळ । ऐशी संख्या बोलिली सकळ। शास्त्रांतरीं ॥ ४॥ चतुर्युगसहस्राणि दिनमेकंपितामहम् । पितामहसहस्राणि विष्णोर्घटिकमेव च ॥ विष्णो