महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे आणि पददलित जनतेचे उध्दारकर्ते म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचे नेहमीच स्मरण केले जाईल. महात्मा ज्योतिबांचा जन्म ११ एप्रिल १८२७ मध्ये झाला तर मृत्यु २८ नोव्हेंबर १८९० मध्ये झाला. सातारा जिल्ह्यातील कटगुण हे त्यांचे मुळ गाव. थॉमस पेन यांचा ’राइट्स ऑफ मॅन’ हा ग्रंथ वाचल्यानंतर आपल्या समाजात शूद्रातीशूद्रांना मिळत असलेली वागणूक, येथील स्त्रीयांची दुर्दशा आणि हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरिती यांचा ते अंतर्मुख होऊन विचार करु लागले. महात्मा फुले यांची वैचारिक दिशा पक्की झाल्यानंतर ते कृतिशील विचारवंत असल्याने त्यांनी लगेच आपल्या संघर्षाला प्रारंभ केला. १८४८ मध्ये फुल्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. शिक्षक कमी पडतात असे लक्षात आल्यानंतर आपली पत्नी सावित्रीबाई यांनाही या कामामध्ये सामावून घेतले. विधवाविवाह चळवळीला त्यांनी चालना दिली व १८६४ मध्ये पुनर्विवाहही घडवून आणला. या सर्व धकाधकीच्या आयुष्यात त्यांना सनातनी मंडळींकडून खूप मानहानी सहन करावी लागली. मात्र सावित्रीबाईंनी त्यांना मनापासून साथ दिली. आपल्या वाड्यातील हौद अस्पृश्यांना खुला करणे, बालविवाह रोखणे, विधवांच्या केशवपनास विरोध, नाभिकांचा संप घडवून आणणे, फसविल्या गेलेल्या स्त्रियांच्या बाळंतपणाची सोय करणे आणि रात्रशाळा काढणे या सर्व आघाडयांवर लढा देऊन आपण कर्ते सुधारक आणि काळाच्या कितीतरी पुढे असल्याचे फुले यांनी सिध्द करुन दाखविले.